
हायकोर्टाने पर्यावरण प्रेमींची याचिका फेटाळल्या नंतर आरेमध्ये रात्रभर झाडांची कत्तल करण्यात आली. शुक्रवारी अर्थात काल संध्याकाळ पर्यंत आरेतील सुमारे साडेतीनशेहून अधिक झाडं कापल्याची माहिती मीडिया न्यूज नुसार मिळत आहे. एकीकडे ही वृक्षतोड पोलिसांच्या निदर्शनात होत आहे तर दुसरीकडे पर्यावरण प्रेमींना याची माहिती मिळताच त्यांनी ‘आरे’मध्ये ठिय्या आंदोलन पुकारलं आहे. परिणामी काल ‘आरे’मध्ये रात्रभर तणावाचं वातावरण असल्याने पोलिस यंत्रणा वाढवण्यात आली आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे नाखूष असणारी मंडळी सोशल मीडियावर कडकडून टीका करत आहेत.
तुम्हाला ठाऊकच असेल की काल आरे मेट्रो कारशेड प्रकरणी हायकोर्टाचा निकाल लागला व कालच संध्याकाळी जवळपास सातच्या सुमारास आरेतील झाडे कापायला सुरुवातही झाली. कदाचित दिवसा पर्यावरण प्रेमींनी कामात अडथळा आणू नये असा त्या मागचा हेतू असावा. मात्र रात्रीच्या अंधारात हे काम फार काळ लपू शकलं नाही. कुठून कोण जाणे पर्यावरण प्रेमी आणि ‘आरे वाचवा’ मोहिमेच्या आंदोलकांना याचा सुगावा लागलाच. आणि शेकडोंच्या संख्येने त्यांनी आरेत प्रवेश केला. प्रसंगी पोलिस सक्रिय झाले आणि त्यांना अडवलं. गेल्या कित्येक दिवसांपासून निसर्गप्रेमी ही झाडे वाचवण्यासाठी दिवसरात्र एक करून जोर लावत होते. पण कोर्टाच्या निर्णयानंतर झालेल्या कत्तलीने त्यांच्या भावना दुखावल्या आहेत.