
महाराष्ट्रातील राजकीय ओढाताण एकदाची संपली असुन काल शिवाजी पार्कवर झालेला शपथविधी सोहळा आवरल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाची पहिली कॅबिनेट बैठक भरवण्यात आली होती. ही बैठक आटोपल्यावर उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्र्यांसह पहिली पत्रकार परिषदही घेतली. दरम्यान त्यांनी कॅबिनेटमधील निर्णयांची माहिती दिली. सोबतच पुढील काळात महाशिवाघाडीचं सरकार कसं व काय काम करणार हे आवर्जून सांगितले.
उद्धव ठाकरे म्हणाले, “हे सरकार सर्व सामान्य माणसाचे सरकार असेल जे कधीही कुणाला दहशत वाटावी असं वागणार नाही आणि महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत करणार नाही; करणार तर मोठी मदत करणार.” असं म्हणत त्यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला. सोबतच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सेवेपासून कामाला सुरुवात केली असं सांगितलं. रायगड किल्ला संवर्धनासाठी २० कोटी मंजूर केले असून पुढील २ दिवसांत शेतकाऱ्यांसाठी मोठी तरतुद करणार असल्याची त्यांनी घोषणा केली.