
आज विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा दिवस अजून मतमोजणी जवळपास शेवटच्या टप्प्यात आहे. आतापर्यंतच्या वृत्तानुसार महाराष्ट्रात भाजप आघाडीवर आहे. मात्र मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या जागा कमी व शिवसेनेच्या जागा वाढतांना दिसत आहे. याचा फायदा घेऊन काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी वादग्रस्त ट्विट केले आहे. निकलाच्या वातावरणात हा एक चर्चेचा विषय बनला आहे.
‘भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे ही काँग्रेसची प्राथमिकता असेल’ असे सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे. सद्यःस्थितीला भाजप १०८ जागांवर आघाडीवर आहे तसेच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी मिळून १६० च्या आसपास जागा आहेत. त्यामुळे भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या तरी हे तीन पक्ष एकत्र आल्यास भाजपला सत्तेवर येणे अवघड होईल. त्यामुळे हे तीन पक्ष भाजपला सत्ता मिळण्यापासून अडवणार का आणि सत्ता नेमकी कोणाच्या हाती जाणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.