
नुकत्याच हाती लागलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांची पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी राज्यसरकारने पूर्ण केली असून त्यामुळे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ५ दिवसांचा आठवडा असून २ दिवस सुट्टी असते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही ५ दिवसांचा आठवडा लागू करण्यात येत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला असून अंमलबजावणीची तारीखही निश्चित झाली आहे.
लोकमतच्या रिपोर्टनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या गेल्या मंगळवारी झालेल्या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या या मागणीचा प्रस्ताव मांडला होता. त्यावेळी दररोजच्या कामातील ४५ मिनिटे वाढवून ५ दिवसांचा आठवडा करण्याची योजना मुख्यमंत्र्यांनी सादर केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या योजनेला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली असून २९ फेब्रुवारीपासून राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असे राज्यसरकारने स्पष्ट केले. तसेच अत्यावश्यक सेवांसाठी हा नियम लागू होणार नसून त्यांच्यासाठी पाच दिवसांचा आठवडा नसेल अशीही तरतूद करण्यात आली आहे.