
नागपूरमध्ये चालू असलेल्या हिवाळी अधिवेशना दरम्यान सभागृहात आज शेतकरी प्रश्नावरून चर्चा सुरू असतांना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यात जोरदार हाणामारी झाली. याच घटनेला समोर ठेवून राष्ट्रवादीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे; ज्यात नरेंद्र मोदी म्हणत आहेत की, “राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आजवर कधीही अधिवेशनादरम्यान सभागृहात कुठल्याही प्रकारचा गोंधळ घातलेला नाही. भाजप नेत्यांनी हे शिकायला हवं.” असं या व्हिडीओत मोदी बोलतांना दिसत आहेत.
मोदींच्या या वक्तव्याची राष्ट्रवादीने भाजप नेत्यांना आठवण करून दिली आहे. सोबतच लिहिले आहे की, “एकीकडे पंतप्रधान मोदी संसदीय राजकारणात वेलमध्ये न उतरल्याबद्दल एनसीपीचं कौतुक करतात आणि राज्यात बीजेपीचे बाशिंदे मोदींच्या अपेक्षेला काळीमा फासतात. राज्यात विरोधी पक्ष म्हणून भाजपा सदस्यांनी विधिमंडळाच्या उच्च परंपरांची अवहेलना चालवली आहे.” राष्ट्रवादीच्या या पोस्टमुळे भाजप नेत्यांना आणि विशेषतः फडणवीसांना सणसणीत चपराक बसली आहे.