
गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर ईडीचा गुन्हा दाखल झाल्याची चर्चा आपण ऐकत आहोत. अशातच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आमदार पदाचा राजीनामा दिल्याची बातमी समोर आली आहे. त्यांचा राजीनामा मंजूर झाला असून त्यानंतर बराच वेळ त्यांचा फोन बंद होता असे मीडिया रिपोर्टवरून समजले. विधानसभा निवडणुका एका महिन्यावर असतांना अजित पवारांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. परंतु त्यांच्या राजीनाम्याचे कारण अजून कळू शकलेले नाही.
राजीनामा देण्याआधी त्यांनी शरद पवार यांच्याशी देखील चर्चा केली नव्हती. यावर भाष्य करतांना शरद पवार म्हणाले की, “अजित पवार ईडीने माझ्यावर केलेल्या आरोपामुळे अस्वस्थ होते असे त्यांच्या कुटुंबियांकडून कळले. त्यांना ते सहन झाले नसल्यानेच त्यांनी राजीनामा दिला असावा.” परंतु त्यांच्या राजीनाम्याच्या कारणाबद्दल बऱ्याच शंका वर्तविल्या जात आहेत. कौटुंबिक वादविवादाला कंटाळून किंवा पक्षांतर्गत राजकारणामुळे किंवा शरद पवारांवर ईडीची केस दाखल झाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असावा अशा अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. तसेच ‘राजीनामा देण्याआधी आपल्या मुलाला देखील राजकारणातून बाहेर पडून शेती किंवा उद्योग करण्याचा सल्ला त्यांनी दिला’ असे शरद पवार यांच्या ट्विटवरून कळले.