
राज्यातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता सरकारने पुढील तयारीस सुरवात केली असून, जून जुलै मध्ये होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येतील प्रचंड वाढीसाठी १ लाख रुग्णांना उपचार मिळतील अशा सुविधा उभारण्यात आल्या आहेत. अतिदक्षता विभागातील १००० बेड हे सज्ज झाले आहेत. असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
” मुंबईची तुलना देशातील कुठल्याच शहराशी करण्यात येऊ नये कारण मुंबई मध्ये अवाढव्य कुठेही पसरलेल्या झोपडपट्टी परिसर आहे, दाट लोकवस्तीमध्ये राहणारे लोक आहेत त्यामुळे मुंबईची गोष्ट वेगळी आहे”, असे राजेश टोपे म्हणाले
“माझ्या आरोग्य खात्यामध्ये १७ हजार ३३७ जागा रिक्त आहेत. मेडिकल एज्युकेशनला ११ हजार जागा रिक्त आहेत. महापालिकांच्या हॉस्पिटलमध्ये हजारो जागा रिक्त आहेत. या सगळ्या जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सगळ्या जागा पुढील दीड महिन्यात भरण्यात येणार आहेत. यासाठी कोणतीही परिक्षा घेण्यात येणार नाही. त्यांचे गुण, अंतर्गत परिक्षा यावरून या जागा भरल्या जाणार आहेत. नर्सिंग कॉऊन्सिल, MBBS ची झालेली परीक्षा, पीजीचे मार्क हे विचारात घेतले जातील. आज उपलब्ध असलेले कर्मचारी अथक परिश्रम करत आहे. ते दमल्यानंतर नवीन दमाची टीम असणे गरजेचे आहे” यामुळे ही भरती तत्काळ करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.