Home महाराष्ट्र पाटी पेन्सिल तयार ठेवा, राज्यात १५ जून पासून शाळांना सुरवात

पाटी पेन्सिल तयार ठेवा, राज्यात १५ जून पासून शाळांना सुरवात

0

कोरोना व्हायरस उद्रेकामुळे दोन महिन्यापासून बंद असलेल्या शाळांमधील शिकवणी येत्या १५ जूनपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सुरवातीला डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे शिकवले जाणार आहे. ग्रीन झोनमध्ये शाळासुद्धा भरणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी जय्यत तयारी सुद्धा केली आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या शिक्षण सचिव आणि शिक्षण आयुक्त यांच्या सातत्याने चर्चा करीत आहेत. त्यात येत्या १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या निर्णयापर्यंत हा विभाग आलेला आहे.

राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सांगितले, “विद्यार्थ्यांची आरोग्य सुरक्षितता महत्त्वाची आहेच; पण त्यांचे शैक्षणिक नुकसानही होऊ नये म्हणून आम्ही 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करीत आहोत. त्यामुळे अध्यापनासाठी विविध पर्यायांचा विचार करीत आहोत. सुरवातीला डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अध्यापन सुरू होईल. टीव्ही, स्थानिक केबल यांसह व्हर्च्युअल क्लासरूम या माध्यमातून शिकविणे सुरू होईल. ”

“शहरी भागात कोरोनाचा फैलाव अधिक आहे. या भागात वर्ग सुरू करता येणार नाहीत. शहरातील विद्यार्थ्यांचा विचार करता अभ्यासक्रम काही प्रमाणात कमी करण्याचाही विचार सुरू आहे. त्यासंबंधी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आढावा घेत आहे,” असे त्यांना सांगितले.