Home महाराष्ट्र घरात न थांबणाऱ्यांना तुरुंगात कोंबणार; थोड्याशा लोकांमुळे सगळे प्रयत्न व्यर्थ जात आहेत:...

घरात न थांबणाऱ्यांना तुरुंगात कोंबणार; थोड्याशा लोकांमुळे सगळे प्रयत्न व्यर्थ जात आहेत: अजित पवार

0

कोरोनासून बचाव करण्यासाठी ‘होम क्वारंटाईन’ किंवा ‘हॉस्पिटल क्वारंटाईन’ असे दोनच पर्याय आजघडीला उपलब्ध आहेत. करोना संसर्ग होऊन ‘हॉस्पिटल क्वारंटाईन’ होण्यापेक्षा नागरिकांनी स्वतःहून ‘होम क्वारंटाईन’ व्हावं, स्वत:चं आणि कुटुंबाचं संपूर्ण संरक्षण करावे” असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. “जे आज घरात थांबणार नाहीत ते काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये किंवा तुरुंगात तरी दिसतील”, असा इशारा त्यांनी दिला आहे.

“काही जणांच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भाजी बाजारातल्या गर्दीमुळे करोना तुमच्या घरात पोहचण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. गावगुंडांकडून पोलिसांवर जीवघेणे हल्ले होत आहेत. या समाजविघातक घटनांची शासनाने गंभीर दखल घेतली आहे.करोना संदर्भातील नियम मोडणाऱ्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल. त्याची सुरुवात काल झाली आहे” असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.राज्य शासनाने आवाहन केले आणि त्यानंतर अनेक खासगी डॉक्‍टरांनी त्यांचे दवाखाने, हॉस्पिटल सुरु केले आहेत. परंतु ज्यांनी त्यांचे दवाखाने अजूनही सुरु केलेले नाहीत त्यांची नोंद राज्य शासनाने आणि स्थानिक नागरिकांनी घेतलीच आहे. या डॉक्‍टरांवर निश्‍चित स्वरूपात कारवाई केली जाईल, असेही अजित पवारांनी सांगितले.

राज्यात अन्नधान्याचा, खाद्यतेलाचा, दूध, भाजीपाल्याचा, औषधांचा, इंधनाचा मुबलक साठा आहे. या जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा कधीही बंद पडणार नाही. त्यामुळे खरेदीसाठी गर्दी करु नये आणि अनावश्यक चिंता करू नये. दिल्लीतील मरकज घटनेपासून धडा घेऊन यापुढे कुठलाही सामुदायिक मेळावा आयोजित होता कामा नये, त्याला परवानगी दिली जाणार नाही, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आज राज्यात रामनवमी भक्तीभावाने, साधेपणाने साजरी केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी सर्व जनतेचे आभार मानले आहेत. यापुढेही सर्व सण, उत्सव साधेपणानं साजरे व्हावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.