
विसर्जनाच्या निमित्ताने राज्य भरात उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं. त्यानंतर आता वेळ आहे निवडणुकांची, हळू हळू विधानसभा निवडणुकांचे वेध सर्वांना लागले असल्याचे दिसून येत आहे. गणेशोत्सव झाल्या नंतर विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होणार असल्याचे बोलले जात होतेच. त्या पार्श्व भूमीवर महाराष्ट्रात आज किंवा उद्यापासून आचार संहिता लागण्याची तसेच निवडणुकांचे वेळा पत्रक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार नेते मंडळींच्या हालचालीही तीव्र होत आहेत.
२०१९ च्या विधानसभा निवडणुका दिवाळीच्या अगोदर पार पडणार असून १५ ते २० ऑक्टोबरच्या दरम्यान मतदान होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. महाराष्ट्रासहित हरियाणा आणि झारखंड या राज्यांमध्येही विधानसभा निवडणुकांच्या तारखा अद्याप घोषित झालेल्या नसून निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेऊन सोमवार पर्यंत तारखा जाहीर करणार असल्याचा अंदाज आहे. या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीने लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने लढणार की नाही हा प्रश्न अजूनही टांगणीला असल्याचे निदर्शनात येते. या शिवाय वंचित-बहुजन आघाडी, मनसे, यांची धोरणे अद्याप स्पष्ट झालेली दिसत नाहीत. एमआयएम-वंचित आघाडी तुटली असून एमआयएम ने तीन उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे. एकंदरीत सर्व पक्षांच्या भूमिका तसेच निवडणुकांचे वेळा पत्रक लवकरच सर्वां समोर येणार आहे, तर जनतेलाही यंदा कोण बाजी मानणार हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.