
बऱ्याच दिवसांपासून मुलांप्रमाणे मुलीलाही वडिलांच्या संपत्तीतील समान वाटा मिळावा या मुद्द्यावर चर्चा सुरू होती. या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने अखेर आपला निर्णय देऊन शिक्कामोर्तब केला आहे. या निर्णयानुसार यापुढे मुलीला व मुलाला वडिलांच्या संपत्तीतील समान वाटा देण्यात यावा असे कोर्टाने जाहीर केले आहे.
२००५ मध्ये देखील वडिलांच्या मालमत्तेतील समान वाटा मुलाला व मुलीला मिळेल असे जाहीर केले गेले होते. मात्र या कायद्यात त्रुटी होती. ती अशी की २००५ पूर्वी ज्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला असेल त्यांच्यासाठी हा कायदा लागू होईल की नाही असे त्यात स्पष्ट केलेले नव्हते. न्यूज18 लोकमतच्या मीडिया न्यूजनुसार आज ११ ऑगस्ट २०२० ला न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली हा कायदा प्रत्येक परिस्थितीत लागू होईल असा ऐतिहासिक निर्णय खंडपीठाने दिला. तसेच संपत्तीच्या वाटणीच्या वेळी वडील हयात असो व नसो, मुलीला मुलांप्रमाणेच समान वाटा मिळाला पाहिजे व प्रत्येक मुलीला पित्याच्या मालमत्तेत वाटा मागण्याचा पूर्ण हक्क आहे असेही या निर्णयात स्पष्ट झाले.