
२५ मार्च पासून बंद असलेल्या प्रवाशी बेस्ट बस सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय बेस्टच्या प्रशासनाने घेतला असून सोमवार दिनांक ८ पासून मुंबईच्या रस्त्यावर बसेस ह्या प्रवाशी वाहतूक करणार आहेत. अर्थात या बसेसमध्ये केवळ चार ते पाच उभ्या प्रवाशांना परवानगी देण्यात येणार आहे. येत्या १० तारखेपासून खाजगी कार्यालये सुरू करण्यास परवानगी मिळाली असल्याने सर्व प्रकारच्या प्रवाशांसाठी बेस्टचा प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
बेस्ट बसेसच्या चालक आणि कंडक्टर यांना ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम न पाळणाऱ्या प्रवाशांना थेट बसखाली उतरविण्याचे अधिकार प्रदान करुन बेस्ट मुंबई शहरातील अत्यावश्यक सेवा पुरवित आहे. दररोज बेस्टच्या सर्वसाधारण 1400 ते 1600 फेऱ्यांद्वारे मुंबई शहरातील डॉक्टर, नर्सेस, पोलीस, पालिका कर्मचारी वर्गाला सेवा देण्यात येत आहे. या फेऱ्या मर्यादीत असल्याने बेस्टच्या बसेसना प्रचंड गर्दी होत होती, त्यामुळे बेस्टच्या अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यात 15 ते 20 बेस्ट आणि वीज कामगारांचा मृत्यू झाला आहे.
एका बसमध्ये उभ्या केवळ चार ते पाच प्रवाशांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच ‘वर्कमन्स स्पेशल’ व रुग्णालयांकरीता राखीव असलेल्या गाड्यांमध्ये सर्व सामान्य प्रवाशांना प्रवेश देण्यात येणार नाही.
दरम्यान बेस्ट उपक्रमामधील कोरोनाची लागण झालेल्या एकूण 360 कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत 208 म्हणजेच 57.78% कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत.